बुलढाणा मुख्य संपादक दमदार २८न्यूज सागर पाटील गव्हाड

सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात : जयश्री शेळके
राज्यात निर्माण झालेल्या गॅस टंचाईच्या समस्येमुळे उद्योग, हॉटेल व्यवसाय तसेच सर्वसामान्य नागरिक मोठ्या अडचणीत सापडले आहेत. घरगुती तसेच व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा अपुरा पडत असल्याने अनेक उद्योगधंदे अडचणीत आले असून काही ठिकाणी उद्योग ठप्प होण्याच्या मार्गावर असल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
यासोबतच पुणे सारख्या शहरांमध्ये शिक्षणासाठी राहणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या गॅस टंचाईचा मोठा फटका बसत आहे. मेस आणि लहान हॉटेल व्यवसाय चालवणे कठीण झाल्याने विद्यार्थ्यांना जेवणाचीही अडचण निर्माण होत असल्याचे चित्र दिसत आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या प्रवक्त्या जयश्री सुनील शेळके यांनी राज्य सरकारवर टीका करत गॅस टंचाईचा प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी केली आहे. राज्यातील एमआयडीसी परिसरातील उद्योगही गॅस अभावी अडचणीत सापडले असून अनेक उद्योग बंद पडण्याच्या स्थितीत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
अशा गंभीर परिस्थितीत राज्य सरकार नेमके काय करत आहे, असा सवाल उपस्थित करत जयश्री शेळके यांनी तातडीने गॅस पुरवठा सुरळीत करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अन्यथा उद्योगधंदे, हॉटेल व्यवसाय आणि सर्वसामान्य नागरिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.